ईश्वरासंबंधीची कर्तव्ये

ईश्वरासंबंधीचे माणसाचे सर्वप्रथम कर्तव्य असे आहे की माणसाने केवळ त्यालाच ईश्वर मानावे व त्या ईशत्वात अन्य कोणासही सहभागी करू नये. आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ‘ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणजे ‘अल्लाहखेरीज अन्य कोणीही ईश्वर नाही’, या ईशवचनावर ईमान धारण केल्याने या कर्तव्याची पूर्तता होते.
ईश्वरासंबंधीचे माणसाचे दुसरे कर्तव्य असे आहे की, ईश्वराकडून जे आदेश येतील त्या सर्वांचा मनःपूर्वक स्वीकार केला जावा. हे कर्तव्य, अल्लाहचे प्रेषित (स.) वर ईमानधारण केल्याने पूरे होते. हे हक्क ‘‘मुहम्मदुर्रसूल्लल्लाह’’ (मुहम्मद ईश्वराचे प्रेषित आहे) यावर ईमान धारण केल्याने अदा होते. याबाबतीत मागे आम्ही तपशीलाने विवरण केलेलेच आहे.
ईश्वरासंबंधीचे तिसरे कर्तव्य असे की त्याच्या आज्ञांचे पालन केले जावे. ईशग्रंथ पवित्र ‘कुरआन’ व प्रेषित मुहम्मद (स.) यांचा उक्ती व आचरण (सुन्नत) संग्रह व नियमांचे पालन केल्याने, हे कर्तव्य पार पडते. याकडेही आम्ही मागे निर्देश केलेला आहे.
ईश्वरासंबंधी चौथे कर्तव्य हे की, त्याची उपासना केली जावी. मागील प्रकरणात निर्देश केल्याप्रमाणे या कर्तव्याची पूर्तता होण्यासाठी काही अनिवार्य कर्तव्ये आहेत. हे कर्तव्य इतर कर्तव्यात अग्रगण्य आहेत. म्हणून ते पार पाडण्यासाठी बाकी कर्तव्यात काही प्रमाणात त्याग करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, नमाज, रोजे, इत्यादी अनिवार्य कर्तव्ये पार पाडताना मनुष्य आपल्या स्वतःच्या देहासंबंधीच्या व आत्म्यासंबंधीच्या बऱ्याचशा कर्तव्यांचा परित्याग करीत असतो. नमाजसाठी मनुष्य भल्या पहाटे उठून गार पाण्याने हात, पाय, तोंड, स्वच्छ करतो (वझू), पूर्ण दिवसात व रात्री आपली निकडीची कामे अनेकदा बाजूला सारतो. रमजान महिन्यात संपूर्ण महिनाभर भूक, तहान व इच्छावासनांना काबूत राखण्याचे क्लेश सहन करतो.
जकातच्या कर्तव्याची पूर्तता करताना आपल्या धनाशक्तीचे ईश्वरावरील आसक्तीत रुपांतर करतो. हज करताना प्रवासाचा त्रास व पैशाच्या खर्चाचा त्रास सहन करतो. जिहादमध्ये स्वतःचे प्राण व धनसंपत्तीचे बलिदान करतो. याच तऱ्हेने इतरांची कर्तव्येही थोड्याफार प्रमाणात त्यागतो. उदा. नमाजासाठी, एक कर्मचारी आपल्या मालकाचे काम बाजूला ठेऊन आपल्या मोठ्या स्वामीच्या उपासनेसाठी जातो. हज करताना एक मनुष्य आपले सर्व व्यवहार सोडून देऊन पवित्र मक्केचा प्रवास करतो व त्यामध्ये इतरांच्या अनेक कर्तव्यावर त्याचा परिणाम होतो. जिहादमध्ये मनुष्य केवळ ईश्वरासाठी प्राण घेतो व प्राण देतो. याच तऱ्हेने माणसाच्या अखत्यारीतील बऱ्याचशा लाभकारक वस्तुचेही ईशकर्तव्य पार पाडताना बलिदान केले जाते. उदा. प्राण्याचे बलिदान व धनाचा व्यय.
परंतु महान ईश्वराने स्वतःविषयीच्या माणसांच्या कर्तव्यासंबंधी काही सीमा घालून दिल्या आहेत. अल्लाहचे जे कर्तव्य पार पाडण्यासाठी इतर कर्तव्याचा जितका किमान त्याग अटळ आहे, त्यापेक्षा अधिक त्याग केला जाऊ नये. उदा. नमाज घ्या. ईश्वराने जी नमाज तुम्हासाठी अनिवार्य केली आहे, ती अदा करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या सवलती ठेवल्या गेल्या आहेत. ‘वजू’ करण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यास अथवा प्रकृती अस्वस्थ असेल तर ‘तयम्मुम’ करा. प्रवासात असाल तर नमाज ‘कसर’ (संक्षिप्त) करा. आजारी असताना नमाज बसून अगर आडवे होऊनही अदा करा. तसेच प्रत्यक्ष नमाजमध्येही जी वचने उच्चारली व पठन केली जातात तीही इतकी काही जास्त प्रमाणात नसतात की त्यासाठी फार वेळ खर्च व्हावा. निवांत वेळ असल्यास, माणसाची इच्छा असेल तर त्याने सूरह ‘बकरा’ सारख्या दीर्घ वचनाचे पठन करावे, परंतु घाईगर्दीच्या वेळी प्रदीर्घ नमाज अदा करण्यापासून रोखण्यात आले आहे. या अनिवार्य नमाजखेरीज एखादी व्यक्ती आणखी काही अतिरिक्त नमाज (नफील) स्वेच्छेने अदा केल्यास त्यापासून ईश्वर प्रसन्न होतो. परंतु ईश्वराची अशी इच्छा नसते की तुम्ही रात्रीची झोप तसेच दिवसाची विश्रांती स्वतःसाठी निषिद्ध करून घ्यावी किंवा आपली उपजीविका अर्जित करण्याची वेळ नमाज अदा करण्यात घालवावी अथवा अल्लाहच्या दासांचे न्याय हक्क डावलून अपहरण करून नमाजच अदा करत राहावे.
याचप्रमाणे ‘रोजे’ करण्यातही सर्व प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या आहेत. वर्षात केवळ एक महिनाभर ‘रोजे’ अनिवार्य केले आहेत, तेसुद्धा प्रवासात व आजारपणात तहकूब (कजा) केले जाऊ शकतात. ‘रोजे’ केलेली व्यक्ती आजारी झाल्यास व जीवाचा धोका असल्यास ती व्यक्ती ‘रोजा’ मोडू शकते. प्रत्यक्ष ‘रोजाचा’ जितका काळ निश्चित केला गेला आहे त्यात एका मिनिटाची ही वाढ करणे बरोबर नाही. ‘सहेरी’च्या शेवटच्या क्षणापर्यंत खाणेपिण्याची परवानगी आहे. इफ्तारची वेळ झाल्याबरोबर ‘रोजा’ सोडण्याचा हुकूम आहे. अनिवार्य ‘रोजा’व्यतिरिक्त जर एखाद्याने अधिक (नफ्ल) रोजे केले तर ती ईश्वराच्या अधिक प्रसन्नतेचे कारण ठरेल. परंतु तुम्ही सतत रोजे करत असावे व जीवनात कोणतेही काम करण्यास असमर्थ होण्याइतपत स्वतःला अशक्त करून घ्यावे. ही गोष्ट ईश्वराला पसंत नाही.
जकातचेही ईश्वराने कमीतकमी प्रमाण ठरविलेले आहे आणि जकात अशा माणसावरच लागू आहे ज्यांच्यापाशी इस्लामने निश्चित केलेली इतकी संपत्ती आहे. याहून जास्त जर कोणाच्या स्वखुषीने ईश्वरी मार्गात खर्च केली, तर ईश्वर त्यावर प्रसन्न होईल. परंतु तुम्ही स्वतःचे व तुमच्या संबंधितांचे हक्कांना बळी देऊन, आपले सर्वस्व दान (सदका) मध्ये देऊन टाकून स्वतः दरिद्री होऊन असहाय्य होऊन राहावे. हे ईश्वराला पसंत नाही. यातही समतोल राखण्याचा आदेश आहे.
आता हजकडे पाहा! प्रथमतः प्रवासखर्चाची कुवत बाळगतात व प्रवासाची दगदग सहन करण्याची क्षमता बाळगतात, केवळ अशा लोकांसाठीच ते अनिवार्य केले गेले आहे. त्यात आणखी एक सवलत अशी ठेवली गेली आहे की आयुष्यभरात एकदा व सोईस्कर असेल तेव्हा जाऊन येऊ शकता. मार्गात युद्ध चालू असेल अगर अशांत परिस्थिती असून त्यामुळे जीवास धोका होण्याचा संभव असेल तेव्हा हजयात्रेची मनिषा तहकूब करू शकता. त्याचबरोबर माता, पित्याची अनुमतीही आवश्यक असल्याचे ठरविले गेले आहे जेणेकरून वृद्ध माता-पित्यांना तुमच्या गैरहजेरीत काही कष्ट पडू नयेत. या सर्व गोष्टीवरून सर्वश्रेष्ठ अल्लाहने आपल्या हक्कपूर्तीमध्ये इतरांच्या हक्कांची किती प्रमाणात दक्षता घेतली आहे हे कळून चुकते.
अल्लाहच्या हक्काची पूर्तता करताना मानवी हक्कांचे सर्वांत मोठे बलिदान ‘जिहाद’ करताना होते. कारण त्यात मनुष्य आपले सर्वस्व, म्हणजे प्राण व संपत्तीसुद्धा ईश्वर मार्गात अर्पण करतो. इतरांचेही प्राण, संपत्ती बळी देतो. परंतु आम्ही या अगोदर म्हटल्याप्रमाणे इस्लामचे तत्त्व असे आहे की, मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी छोटे नुकसान सहन केले पाहिजे. हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवा व मग पाहा. काही शेकडे, काही हजार, काही लाख माणसांची हत्या होण्याच्या कित्येक पट मोठे नुकसान असे आहे की, सत्याच्या विरोधात असत्याची वृद्धी व्हावी. अल्लाहचा ‘दीन’ (ईशधर्म) सत्याचा इन्कार करणाऱ्यांसमोर, अनेकेश्वरवादासमोर, असत्यासमोर व अनिश्वरवाद्यासमोर दबून व नमून राहावा. पृथ्वीवर मार्गभ्रष्टता व अनाचार यांचा प्रसार व्हावा, वगैरे.
याचकरिता अशा विशाल नुकसानीपासून वाचण्यासाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने मुस्लिमांना असा हुकूम दिला आहे की, प्राणाच्या व धनसंपत्तीच्या तुलनात्मक छोटे नुकसान ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी सहन केले जावे. परंतु त्याचबरोबर हेही सांगून ठेवले आहे की, जितके किमान रक्त सांडणे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त रक्त सांडू नका. वृद्ध, स्त्रिया, मुले, आजारी व जखमी माणसांवर हत्यारे उचलू नका. केवळ अशाच लोकांशी लढा जे असत्याच्या समर्थनार्थ तलवार हातात घेतात. शत्रूप्रदेशात अनावश्यक विध्वंस व बरबादी करू नका. शत्रूवर विजय मिळविला तर त्याच्याशी न्यायाने वागा. एखाद्या गोष्टीवर शत्रूशी करार झाला तर त्याचे पालन करा. सत्याशी वैर करण्याचे शत्रूंनी सोडून दिले तर लगेच युद्ध थांबवा. अल्लाहच्या हक्काच्या पूर्ततेच्या मार्गात मानवी हक्काच्या बलिदानाची जेवढ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात बलिदान करणे धर्मपसंत नाही.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Theme images by 5ugarless. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget